काही दिवसांपूर्वीच चंदीगढच्या हरनाज सिंधूने मिस युनिव्हर्सचा ताज जिंकत इतिहास रचला. तब्बल २१ वर्षांनी आपल्याकडे हा ताज आला आहे. आतापर्यंत भारतातील अनेक सौंदर्यवतींनी वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग घेत भारताचे अतिशय मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर प्रतिनिधित्व केले आहे. काहींनी या स्पर्धांमध्ये यश मिळवत देशाचे आणि पर्यायाने स्वतःचे नाव उंचावले तर काहींना अपयश पचवावे लागले. आपण अनेकदा पाहतो की, सौंदर्य स्पर्धा जिंकणाऱ्या अनेक सौंदर्यवती मनोरंजनाच्या जगात दिमाखात पदार्पण करतात आणि त्यांचे करिअर घडवतात. बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्यांनी विविध सौंदर्य स्पर्धांमध्ये जागतिक पातळीवर मोठे यश संपादन केले आहे. मात्र यात अशा देखील काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी सौंदर्य स्पर्धा तर नक्कीच जिंकल्या पण त्या ग्लॅमर जगात आल्या नाही त्यांनी वेगळ्या क्षेत्रात त्यांचे करिअर बनवत वैयक्तिक आयुष्यात लग्न करून सेटल झाल्या. आजपण जाणून घेऊया अशाच काही सौंदर्यवतींबद्दल आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल.
रिता फारिया :
रिता यांनी १९६६ साली मिस वर्ल्डचा किताब मिळवला होता. मुंबईत जन्मलेल्या रिता या पहिल्या भारतीय आणि आशियायी सौंदर्यवती ठरल्या, ज्यांनी मिस वर्ल्डचा ताज जिंकला. मेडिकलच्या अभ्यास करणाऱ्या आणि २३ वर्षाच्या असणाऱ्या रिता यांनी ही स्पर्धा जिंकत इतिहास रचला होता. रिता यांनी ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांनी अनेक मोठमोठ्या चित्रपटांसाठी आणि मॉडेलिंग असाइनमेंटच्या ऑफर आल्या होत्या. मात्र त्यांनी त्या सर्व नाकारल्या आणि त्यांचे डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी त्यांचे उच्च शिक्षण लंडनमधून पूर्ण केले. पुढे १९७१ साली त्यांनी David Powell यांच्याशी लग्न केले. त्या एक यशस्वी डॉक्टर असल्या तरी त्या मध्ये मध्ये काही सौंदर्य स्पर्धांमध्ये परीक्षकाच्या भूमिकेतही दिसतात. त्यांना दोन मुली असून आता रिता डब्लिनमध्ये स्थायिक झाल्या आहेत.
ऐश्वर्या राय :
बॉलिवूडमधील सौंदर्यवती म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या म्हणजे सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. ऐश्वर्याने देखील १९९४ साली मिस वर्ल्डचा ताज जिंकला. मिस वर्ल्ड झाल्यानंतर तिला बॉलिवूडमधून अनेक ऑफर आल्या. ऐश्वर्याने या ऑफर स्वीकारून चित्रपटांमध्ये पदार्पण केले. पुढे २००७ साली तिने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केले आणि ती बच्चन घराची सून बनली. अभिषेक आणि ऐश्वर्या यांना आराध्या नावाची मुलगी असून, ऐश्वर्या अजूनही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.
डायना हेडन :
डायना हेडनने १९९७ साली मिस वर्ल्डचा किताब जिंकला. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र इथे तिला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर ती बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून देखील दिसली. २०१३ साली डायना अमेरिकेलतील लॉस वेगासमध्ये राहणाऱ्या एका उद्योगपतीसोबत लग्न केले. तिला तीन मुलं असून, आता ती तिच्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेत आहे.
युक्ता मुखी :
१९९९ साली युक्ता मिस वर्ल्ड झाली. त्यानंतर तिनेंहि बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली, मात्र तिलाही इथे अपयश मिळाले. त्यानंतर तिने २००८ साली न्यूयॉर्कमधल्या प्रिन्स तुली या उद्योगपतीसोबत लग्न केले. मात्र दुर्दैवाने त्यांचे लग्न जास्त टिकू शकले नाही आणि २०१४ साली त्यांनी घटस्फोट घेतला. २०१९ मध्ये युक्ताने ‘गुड न्यूज’ या सिनेमात काम केले होते.
लारा दत्ता :
मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी लारा सुश्मिता सेननंतरची दुसरी सौंदर्यवती ठरली. तिने २००० साली हा ताज जिंकला. त्यानंतर लारा बॉलिवूडमध्ये आली. इथे ती एक यशस्वी अभिनेत्री ठरली. तिने अनेक हिट सिनेमे दिले असून, ती वेबसिरीजमध्ये देखील यशस्वी ठरली आहे. लाराने भारतीय टेनिस स्टार असणाऱ्या महेश भूपतीसोबत लग्न केले असून, त्यांना एक मुलगी आहे.
हेही वाचा :
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी करत होता ऍड एजेन्सीमध्ये काम, जाणून घ्या जॉन अब्राहमचा पहिला पगार