श्रीदेवी म्हणजे हिंदी सिनेसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न. मात्र अचानक जाग यावी आणि हे स्वप्न भंगाने, असेच काहीसे झाले ते २४ फेब्रुवारी २०१८ या दिवशी. बॉलिवूडच्या या मिस हवाहवाईने तीन वर्षांपूर्वी आपल्या सर्वांचा निरोप घेतला. श्रीदेवी म्हणजे अभिनय, नृत्य आणि सौंदर्य या तिन्ही गोष्टींचा उत्तम मिलाप होत्या. श्रीदेवी यांनी त्यांच्या अभिनयाने अनेक दशकं हिंदी सिनेमांवर राज्य केले. त्यांच्या लोकप्रियतेनेच त्यांना भारतीय सिनेइंडस्ट्रीची पहिली महिला सुपरस्टार हा किताब मिळवून दिला. श्रीदेवी यांच्या आकस्मिक जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांसोबतच फॅन्सला देखील जोरदार धक्का बसला होता.
नुकतीच श्रीदेवी यांची तिसरी पुण्यतिथी झाली. त्यानिमित्ताने सामान्यांपासून कलाकारांपर्यंत अनेकांनी श्रीदेवी यांना आठवत श्रद्धांजली वाहिली. याच पार्श्वभूमीवर श्रीदेवी यांचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये श्रीदेवी आणि प्रभुदेवा पुरस्कार सोहळ्यादरम्यान जबराट डान्स करत असून, प्रेक्षकांमध्ये बोनी कपूर आणि जान्हवी कपूर दिसत आहे. श्रीदेवी यांच्या डान्सचे सर्वच दिवाने होते. त्यांना डान्स करताना पाहणे म्हणजे सर्वांसाठीच एक पर्वणी असायची.
अशीच एक संधी २०१२ साली सर्वांंना पाहायला मिळाली. निमित्त होते आयफा पुरस्कारांचे. २०१३ साली संपन्न झालेल्या आयफा अवॉर्ड्स दरम्यान श्रीदेवी यांनी प्रभुदेवा यांच्यासोबत त्यांच्या सर्व सुपरहिट गाण्यांवर डान्स करत उपस्थितांचे आणि हा कार्यक्रम बघणाऱ्यांची मनं जिंकली होती. त्यांनी त्यांच्या काळात नेहमीच त्यांच्या डान्सने सर्वांना घायाळ केलेच होते. ह्या पुरस्कारादरम्यान सर्वाना संधी पुन्हा अनुभवायला मिळाली. श्रीदेवी यांना स्टेजवर डान्स करताना पाहून प्रेक्षकांमध्ये बसलेल्या बोनी कपूर आणि त्यांची मुलगी जान्हवी कपूर यांना खूपच आनंद झाला. हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यांनी त्यांच्या अदांनी, निरागसतेने सर्वांनाच वेड लावले होते. हा व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्यांनीच श्रीजी यांची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून अभिनयात काम करायला सुरुवात केली होती. हिंदीसोबतच त्यांनी तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आदी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले. ८०/९० च्या काळात श्रीदेवी सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्यांना फिल्मफेयरसोबत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. २०१३ साली त्यांना भारत सरकारकडून सर्वोच्च ‘पद्मश्री’ पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते.
हेही वाचा-