झी मराठी वाहिनीवरील ‘हे तर काहीच नाय’ या कॉमेडी शोने प्रेक्षकांना अल्पावधीतच आपलेसे केले आहे. या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये कलाकार जबरदस्त विनोद करून प्रेक्षकांना खळखळून हसवतात. हा शो पाहताना प्रेक्षक देखील त्यांचे दुःख आणि टेन्शन विसरून खळखळून हसतात. त्याचबरोबर या शोमध्ये मराठी विश्वातील अनेक कलाकार हजेरी लावत असतात. इतकच नव्हे, तर हे कलाकार येथे येऊन विनोद करत प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. त्याचबरोबर कलाकार आपल्या आयुष्यातील अनेक मनोरंजक किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करत असतात.
आत्तापर्यंत या शोमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावून एकापेक्षा एक मजेशीर किस्से प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत. आतापर्यंत या शोमध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi), विणा जगताप (Veena Jagtap), ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) आणि सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांसारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. नुकतीच आता मराठी विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी (Sushma Shiromani) यांनी हजेरी लावली आहे. याचा प्रोमो आता प्रदर्शित करण्यात आला असून, तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे.
त्याचवेळी या शोमध्ये सुषमा शिरोमणी यांनी आपल्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. सुषमा शिरोमणी यांनी भारत बंद आणि ‘कुठं कुठं जायाचं हनीमुनला’ यांचा एकमेकांशी काय सहसंबंध आहे, याचा खुलासा केला आहे. इतकचं नाही, तर सुषमा शिरोमणी यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) याच्याबद्दल देखील एक खुलासा केला आहे.
सुषमा शिरोमणी यांच्या कारकीर्दीतील ‘फटाकडी’ या चित्रपटातील बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) यांनी केलेले आयटम साँग हे कोणीच विसरू शकत नाही. या आयटम साँगसाठी त्यांचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते. या गाण्याबद्दल किस्सा सांगताना त्या म्हणाल्या की, “त्यावेळी एक मोठी घटना घडली होती आणि भारत बंद होणार होता. त्याच्यादिवशी या गाण्याचे शुटिंग होते. मग मी हे रेखाला सांगितले व ती म्हणाली काही काळजी करू नकोस. आपण रात्रीच स्टुडिओत जाऊन बसू. आम्ही तसंच केलं आणि दुसऱ्यादिवशी गाण्याचं चित्रीकरण झालं.”
त्याचवेळी सुषमा शिरोमणी यांनी शाहरुख खानबद्दल एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की, “ऑस्कर पुरस्कार आले त्यावेळी मी त्याची चेअरपर्सन होते. त्यावेळी शाहरूख खानचा ‘अशोका’ आणि अमिर खानचा ‘लगान’ हे दोन सिनेमे चांगलेच चर्चेत होते. त्यावेळी माझे लहानपणापासून कोणी जेवढे लाड पुरवले नसतील तेवढे चेअरपर्सन झाल्यावर पुरवले. हे लाड दुसऱ्या कुणी नाही, तर शाहरूख खान तसेच जुही चावला यांनी पुरवले. मला जरा काही झाले की, तरी शाहरूख खान माझी काळजी घ्यायचा व लाड पुरवायचा. त्याची इच्छा होती की, मी त्याचा सिनेमा ऑस्करसाठी पास करावा. मात्र मी प्रामाणिक होते, मी आमिर खानच्या ‘लगान’ सिनेमाला ऑस्कर देण्याचा निर्णय घेतला.” त्यांनी असेही सांगितले की, त्यांचा हा निर्णय ऐकून त्यांचे लाड करण्यासाठी पुन्हा कोणीही आले नव्हते.
हेही वाचा :