Friday, March 29, 2024

सुशांतच्या जीवनानावर आधारित ‘न्याय: द जस्टिस’ या चित्रपटासोबतच ‘हे’ सिनेमेही अडकले होते वादाच्या भोवऱ्यात

‘सिनेमा’ आणि ‘वाद’ यांचे फार जुने नाते आहे. चित्रपटाचे प्रदर्शन तोंडावर आले की, काही ना काही वाद उकरून काढायचा हा फंडा खूपदा दिसला आहे. असे अनेक चित्रपट आहेत, जे कित्येकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यामुळे जाती, धर्म आणि खूप काही अशा गोष्टी आहेत, ज्यांना उचलून धरले जात होते.

सुशांत सिंग राजपूतच्या जीवनावर आधारित ‘न्याय -द जस्टिस’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वादात सापडला आहे. स्वत: ला सुशांतचा चाहता म्हणून सांगणारा मनीष मिश्रा याने यासंबंधी प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यासोबतच अनेक लोक या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. या चित्रपटापूर्वी असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते चित्रपट.

१. लक्ष्मी
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात अडकला होता. या चित्रपटाचा ट्रेलर समोर येताच लोकांनी मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलीच्या प्रेमकथेला लव्ह जिहाद सोबत जोडण्यास सुरुवात केली. चित्रपटाचे प्रमोशन जबरदस्त सुरू होते. पण चित्रपटाच्या शीर्षकावरून सुरू झालेला वाद काही केल्या शमत नव्हता. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी सुरू झाली. अखेर हा शीर्षक वाद मिटावा म्हणून या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आणि चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ वरून फक्त ‘लक्ष्मी’ असे करण्यात आले.

२. पद्मावत
दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांचा ‘पद्मावत’ या चित्रपटालासुध्दा वादाचा सामना करावा लागला होता. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी देशभरात या सिनेमाच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. लोकांचा असा आरोप आहे की, या चित्रपटातील बऱ्याच गोष्टी या चुकीच्या पद्धतीने मांडल्या गेल्या आहेत. तसेच राजपूत समुदायाला चुकीचे दर्शविण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यामुळे नंतर काही दृश्ये आणि शीर्षक यांच्यात बदल करून २५ जानेवारी २०१८ ला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

३. उडता पंजाब
‘उडता पंजाब’ या चित्रपटात पंजाबच्या वाढत्या व्यसनाधीनतेच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता. परंतु पंजाबची प्रतिमा ढासळत चालली आहे, असा निषेध या चित्रपटावर लोकांनी केला. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने खूप सारे बदल करून चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी दिली.

४. मणिकर्णीका
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित ‘मणिकर्णीका’ चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री कंगना रणौत होती. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सर्व ब्राह्मण महासभेने राणी लक्ष्मीबाईच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे वर्णन केल्याचा आरोप करत या चित्रपटावर निषेध नोंदवला होता.

५. ‘गोलियों की रासलीला- रामलीला’
संजय लीला भन्साळीच्या ‘गोलियों की रासलीला- रामलीला’ या चित्रपटाच्या नावावरुनही बरेच वाद झाले होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी काही लोकांना दिली गेली होती. त्यामुळे नाईलाजाने भन्साळींनी या चित्रपटाचं नाव बदलून ‘गोलियों की रासलीला- रामलीला’ असं करण्यात आले. क्षत्रिय समाजातील लोकांची चुकिची प्रतिमा दाखवली जात असल्याचा आरोप या चित्रपटावर केला गेला होता.

६. धर्म संकट में
सन २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘धर्म संकट में’ हा चित्रपट संवेदनशील प्रकरण असल्यामुळे बऱ्याच वादात सापडला होता. यात परेश रावल हे मुस्लिम वर्गाविरुद्ध बोलताना दिसले. त्यानंतर त्यांना कळले की त्यांचे पालक मुस्लिम असून एक हिंदू कुटूंबाने त्यांना दत्तक घेतले आहेत. हा एक नाजूक मुद्दा असल्याने सेन्सॉर बोर्डाने चित्रपट पाहण्यासाठी हिंदू आणि मुस्लीम गुरूंना बोलावलं होतं जेणेकरून ते त्याचे पर्यावेक्षण करू शकतील. आणि त्यातील काही विधाने काढून नंतरच हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

७. हैदर
भारतीय लष्कराची नकारात्मक भूमिका दर्शविण्याचा आरोप ‘हैदर’ या चित्रपटावर लावला गेला होता. सोबतच काही दृश्यांवर देखील जनतेने आक्षेप घेतला असल्याने या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, बंदी उठवल्यावर बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अधिक हिट झाला होता.

८. माय नेम इज खान
सन २०१० मध्ये प्रदर्शित झालेला ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चांगलाच वादात होता. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आणि सुपरस्टार शाहरुख खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा देखील समावेश असावा. शाहरुखच्या या वक्तव्यानंतर लोकांनी त्याला पाकिस्तानी समर्थक म्हणून त्याच्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

९. वॉटर
‘वॉटर’ हा चित्रपट विधवा महिलांच्या जीवनावर आधारित होता. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांना बऱ्याच वादाचा सामना करावा लागला. काहीवेळा शूटिंग सेटवरही हल्ला करण्यात आला होता, तर काही संघटनांनी चित्रीकरण थांबविण्यासाठी सुसाइड प्रोटेस्टचा वापरही केला.

१०. मद्रास कॅफे
सन २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटामध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचे चित्रण करण्यात आले होते. या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होता. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच तमिळ राजकीय पक्षांनी या चित्रपटावर नकारात्मक प्रतिमा दाखवल्याचा निषेध केला होता. अनेक तमिळ पक्षांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी देखील केली होती.

११. फायर
‘फायर’ या चित्रपटामध्ये समलिंगी संबंध उघडपणे दाखवले आहे. त्यामुळे शबाना आझमीच्या या चित्रपटाला शिवसेनेने तीव्र निषेध नोंदवला होता.

१२. बॅंडिट क्वीन
शेखर कपूर निर्मित फूलन देवीवर आधारित ‘बॅंडिट क्वीन’ हा चित्रपट बऱ्याच वादाच्या भोवऱ्यात होता. द्वेष युक्त भाषण, नग्नता आणि लैंगिक संभाषणामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. १९९४ मध्ये बनलेला हा चित्रपट दोन वर्षाच्या वादानंतर १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कपूरपासून ते धर्मेंद्रपर्यंत दिग्गज अभिनेते तरसायचे ‘या’ अभिनेत्रीसोबत काम करायला, एका चुकीमुळे भोगावी लागली मोठी शिक्षा
-आपल्या मोहक अंदाजाने बॉलिवूड तारकांना मागे सोडणारी ‘गोपी बहू’, जाणून घ्या तिच्याबद्दलच्या खास गोष्टी

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

हे देखील वाचा