Saturday, July 27, 2024

‘महाराजांचं नाव फक्त धर्माच्या अंगानं…’; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते म्हणजे किरण माने होय. ते नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात. किरण माने यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. किरण माने सतत त्यांचे मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात. त्यांनी नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या सद्य परिस्थितीवर भाष्य करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्राचाही उल्लेख केला आहे.

किरण माने (Kiran Mane) यांनी पोस्ट करताना लिहिले की, “तुम्हाला ठावं हाय का? शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदरानं कर्ज देनारे पहिले राज्यकर्ते कोन होते? आपले छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचं नांव आजकाल फक्त धर्माच्या अंगानं सोयिस्कररीत्या पुढं आनलं जातं. सगळ्या सिनेमातनंबी फक्त मुघलांशी झालेल्या लढाईच्या कथा रंगवून दाखवल्या जातात. त्यातनं महाराजांच्या व्यक्तीमत्त्वातली नव्वद टक्के बाजू लपवून ठेवून, प्रेक्षकांमध्ये नको ती एनर्जी ठासून भरली जाते. शिवरायांना ‘महान’ तर म्हनायचं, त्यांचा जयजयकार तर करायचा…पन रयतेच्या हिताचे निर्णय घेनारा, सर्व जातीधर्मांचा आदर करनारा, समता आणि मानवताधर्म जपनारा ‘जाणता राजा’ जानूनबुजून दुर्लक्षित ठेवायचा. मग अशा परिस्थितीत ‘शेतकर्‍यांची मनापास्नं काळजी घेनारा’ हा राजा तुमच्यापर्यन्त ते कसा पोचू देतील?

आजच्या घडीला आपन भयान दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. पडला तर तिच्यायला अस्सा मुसळधार पडतोय, का हाय नाय ते सगळं धुवून नेतोय… आन् नाय पडला तर पाक वाळून, करपून राखरांगोळी हुतीय… शिवरायांना अतीप्रिय असलेल्या शेतकर्‍याचं आज लै लै लै बेक्कार हाल चाल्लेत. महिनाभरापुर्वी आमचं शुटिंग एका शेताजवळ चाललंवतं. तिथं पावसानं ओढ दिल्यामुळं शेतकरी स्प्रिंकलरनं सोयाबीनला पानी द्यायचे. पन लाईट सारखी जायची यायची. चोवीस तासात अर्धा गुंठाबी रान भिजायचं नाय. रात्री-अपरात्री कमरेएवढ्या वाढलेल्या पिकातनं, पायात सळसळनार्‍या जनावरांची पर्वा न करता, जीवावर उदार होऊन फिरनारे शेतकरी मी बघितलेत… लै जीव कासावीस व्हायचा बघून.

खरंतर हे भयाण वास्तव न्युज चॅनलवरनं रोज समोर आलं पायजे. पन कोन उठून कुठल्या पक्षाच्या वळचनीला गेला, कुनाच्या मागं इडी लागलीय… कुना नेत्याची सेक्स क्लीप सापडली, कुनाची खुर्ची धोक्यात हाय… कुनी किती आमदार किती खोके मोजून इकत घेतले… ह्यातनं आपलं महाराष्ट्राचं राजकारण बाहेरच पडंना ह्येज्यायला… ह्या गदारोळात वरडून वरडून दुष्काळाची पूर्वकल्पना देनारे आवाज बसले… जगाच्या पोशिंद्याचे डोळे पांढरे व्हायची येळ आली. शेतकरी आत्महत्या वाढल्या. ‘इलेक्शन’ डोळ्याफुडं ठिवुन घोडेबाजारात रमलेले नेते दुष्काळासाठी उपाययोजना आन् तयारी करायचंच इसरून गेलेत ! बसा बोंबलत.

बरं आपन आपल्याच सरकारला हक्कानं सोशल मिडीयावरनं जाब इचारावा, तर लगी ट्रोल पिलावळीची जुनी पाक चोथा झालेली कॅशेट सुरू, ‘पूर्वीच्या सरकारनं काय केलं’. मग आपन म्हन्नार,”ते बिनकामाचे होते म्हनून तुमाला आनलं ना? तुमी काय केलं?” ह्या भांडनात मूळ इषय आन् आमचा शेतकरी परत बाजूला पडनार.. असो. तर छ. शिवरायांनी आपल्या सरदारांना लिहीलेलं एक पत्र वाचलं मी परवा. त्यात त्यांनी काही गोष्टींबद्दल सक्त आदेश दिले.

लै लै लैच भारी पत्र हाय ते… शिवरायांच्या नांवावर राजकारन करनार्‍या आपल्या राज्यकर्त्यांपर्यंत ते पोहोचावं आन् ‘राजांचा आदेश’ समजून त्यांनीबी कामाला लागावं, हा माझा उद्देश.. छ. शिवराय सांगतात, “गावोगाव फिरा. शेतकर्‍यांच्या बैठका घ्या. त्यांची मायेनं विचारपूस करा. पेरणीला आवश्यक बियाणे, मनुष्यबळ नसेल, औतकाठी नसेल, बैल-बारदाणा नसेल तर तो सगळा त्याला पुरवा. त्याच्या सगळ्या अडचणींचे जातीने निराकरण करा. त्याला जगायलाही धान्य पुरवा.
नवे पिक आले की, त्याच्याकडून कर्जाची रक्कम त्याच्या कलाकलाने (हप्त्याहप्त्याने) वसूल करा. फक्त मुद्दल तेवढे घ्या. व्याज माफ करा. कर्जफेडीसाठी त्याच्यावर जोर जबरदस्ती करू नका.

शेतकरी खुष राहील, आनंदी असेल याची काळजी घ्या. शेतकरी जगला तर स्वराज्य जगेल. काय बोलू? वाचताना डोळे पाणावले… अक्षरं धूसर झाली… ‘राजा’ असा असतो भावांनो. आपले गुरू संत तुकोबारायांनी सांगीतलेल्या “आर्तभुतांप्रती । उत्तम योजाव्या त्या शक्ती ।।” या वचनाचे तंतोतंत पालन करून राज्य करनार्‍या माझ्या लाडक्या राजाला मानाचा मुजरा ! जय शिवराय.”

किरण माने यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांनी स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत काम केले आहे. त्या मालिकेत काम करताना त्यांचे कलाकारांशी वाद झाले होते. सध्या ते एका मराठी मालिकेत काम करत आहेत.

आधिक वाचा-
लग्नात परिणीतीने पतीला दिले खास सरप्राईज, अभिनेत्रीने गायिलेल्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा
‘या’ अभिनेत्रीने अभिनय क्षेत्राला ठोकला रामराम? चर्चांवर प्रतिक्रिया देत म्हणाली, ‘मी अभिनय…’

हे देखील वाचा