Wednesday, April 17, 2024

माझा आदर्श नागराज मंजूळे, असं बोलणाऱ्या अभिनेता किरण मानेंनी सांगितलं नागराजच्या यशाचं ‘रहस्य’

अभिनेते किरण माने हे मागील काही काळापासून तुफान चर्चेत आले आहे. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून त्यांना काढून टाकण्यात आल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले. हा वाद आज बरेच दिवस झाले तरी अजूनही चालूच आहे. या दरम्यान बरेच आरोप आणि प्रत्यारोप झाले पण यातून शेवटी खच निष्पन्न झाले नाही. आता किरण माने यांनी कोर्टाची मदत घेण्यासाठी कोर्टात जाण्याचे ठरवले आहे. यातच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या किरण माने यांनी त्यांच्या तिखट पोस्टने देखील मोठ्या प्रमाणावर मीडियामध्ये बज निर्माण केला. आता पुन्हा एकदा किरण माने यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. नागराज मंजुळे यांच्यावर आधारित असलेली ही पोस्ट सध्या इंटरनेटवर खूपच व्हायरल होत आहे.

किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “….नागराज मंजुळेसारखा गांवखेड्यातला पोरगा एक सिनेमा करतो भावांनो.. त्या एका सिनेमातनं त्यो मराठीत गेली पंध्रावीस वर्ष सिनेमा करत असलेल्या तमाम दिग्दर्शकांना लै लै लै मागं टाकून एकशेवीसच्या स्पीडनं फुडं निघून जातो.. कसं साधलं आसंल हो हे? त्यानं एक अशी कलाकृती निर्मान केली, की जी बघुन तुमचं मनोरंजन तर झालंच, पन तुमच्या मेंदूला झिनझिन्याबी आल्या.. आपल्या आसपास बघून, आपन दुर्लक्षित केलेलं वास्तव लै बेक्कार अंगावर आलं.. फुढच्या पिढीतल्या दिग्दर्शकांसाठी एक बेंचमार्क सेट केला त्यानं. जे आजपर्यन्त कुनीच केलं नव्हतं… नंतर वरवरची नक्कल करनारे ग्रामीन सिनेमे आनि लव्हश्टोर्‍या लै आल्या.. पन नागराजचा ‘गाभा’ ते पकडू शकले न्हाईत. का?? ह्या यशाचं रहस्य काय???
…एकच कारन – नागराजनं सोत्ता भोगलेलं, सोसलेलं, अनुभवलेलं जगनं आपल्यासमोर कलात्मक रीतीनं मांडलं ! ते मांडन्याआधी त्यानं सिनेमाच्या तंत्राचा, बारकाव्यांचा, चित्रभाषेच्या ताकदीचा सखोल अभ्यासबी केला… त्यो तांत्रीक अभ्यास हल्ली कुठंबी-कुनालाबी शिकायला मिळतो. पन छोट्या खेडेगांवात, शाळा शिकनारा खोपटात र्‍हानारा, एक वडार किंवा कैकाडी किंवा तत्सम समाजातला हुशार-संवेदनशील पोरगा, मोठा होऊन ते सिनेमाचं तंत्र शिकतो, तवा त्या शिक्षनाला ‘धार’ येते. विशेष म्हन्जी, हे तंत्र शिकताना, ल्हानपनी वर्चस्ववादी गावभाड्यांनी, “अय् फॅंड्रीS” अशी हाक मारून, काळजावर मारलेला दगड त्यो इसरलेला नसतो.. ती जखम अजून ताजीच असते.. आता कॅमेर्‍याचं तंत्र शिकून त्यो त्या हेटाळणीरूपी दगडाला आपल्या कलाकृतीतनं उत्तर द्यायचं ठरवतो.. निव्वळ त्यामुळंच भावांनो, ती कलाकृती एवढी महान ठरते ! आपन लोकांसमोर जे मांडतो, ते आपन सोत्ता अनुभवलेलं आसंल तर ते जास्त खोलवर आनि दीर्घकाळ घुसनारा परीनाम देतं !! तुकोबारायाचे अभंग अजरामर व्हायचं कारनबी नेमकं हेच होतं.. त्याच्या अभंगाच्या नकला त्याकाळात लै जनांनी करून तुकोबारायासारखं फेमस शेलीब्रीटी होन्याचा ट्राय मारलावता… पन ते त्यांना जमलं नाय.. कारन तुकोबाराया फक्त शब्दाला शब्द जोडून कवनं करत नव्हता… आपन सोसलेली वेदना तो अभंगरूपात मांडत होता.हे सांगताना तुकोबाराया म्हन्तो :
“अनुभवें आलें अंगा । ते या जगा देतसें ।।
नव्हती हाततुके बोल । मूळ ओल अंतरिंची ।।
उतरूनि दिलें कशीं । शुद्धरसीं सरे तें ।।
तुका म्हणे दुसरें नाहीं । ऐसी ग्वाही गुजरली ।।”
…माझ्या स्वतःच्या अनुभवातनं जे आलं आहे, तेच मी जगाला देत असतो, सांगत असतो.
…माझं बोलणं म्हणजे निव्वळ वरवरची कोरडी पोपटपंची नाही. माझ्या बोलण्याच्या मूळाशी माझ्या अंतरातला-काळजातला रसरशीत ओलावा आहे !
…मी जे बोलतो ते अनुभवाच्या, सत्याच्या, शुद्धतेच्या कसाला लावून उतरले आहे… सिद्ध झाले आहे.
…शेवटी तुका म्हणे : “मी सांगतो त्यासारखं अस्सल, स्वानुभवाच्या कसोटीतून उतरलेलं खणखणीत सत्य जगात दुसरीकडं मिळणार नाही याची मी ग्वाही देतो !!!
…चारशे वर्षांनंतरबी तुकोबारायाचे अभंग आपन आजच्या काळाशी जोडू शकतो, ताजेतवाने वाटत्यात ह्याचं मूळ कारन हेच हाय राजेहो ! एकेक अभंग ल्हीताना तुकोबाराया लै सावध होता. डोळसपने प्रत्यक्ष अनुभव घेऊन, जीवनाच्या कसोटीवर घासून, सारासार विचार करून लिहीत होता !! खायचं काम नाय हे भावांनो. ते गरजेचंबी होतं. आधीच वर्चस्ववादी व्यवस्थेनं अडानी जनतेला अंधश्रद्धांच्या जाळ्यात अडकवलं होतं.. देवाधर्माच्या, कर्मकांडाच्या नावावर त्यांचं शोषन चालवलं होतं.. त्यात परत आपन वरवरचं ग्यान पाजळनं म्हंजी जनतेला आगीतनं फुफाट्यात ढकलनं… म्हनून तुकोबानं आधी आपलं अनुभवविश्व समृद्ध केलं.
…तुकोबारायाच्या काळातबी सर्वसामान्यांना भरकटवनार्‍या अनेक गोष्टी भवताली होत्या. तुकोबालाबी त्याकाळातल्या न्यूजमधी, तवाच्या फेसबुकवर,व्हाॅट्सॅपवर लै बघाय-वाचाय मिळत व्हतं…पन त्यो वाघ कुठल्याबी फसव्या ‘फाॅरवर्डेड मेसेजेच्या’ लाटंत वाहून गेला नाय. खोलात जाऊन इचार केला. इतिहास चाळला, पोथ्यापुरानं धुंडाळली.. भवतालचा समाज-मानसं-उतरंड उघड्या डोळ्यांनी वाचून काढली.. वाचलेल्यावर मनन-चिंतन केलं. विवेक जागा ठेवला. एखांदा शास्त्रज्ञ जसा शोध लावन्याआधी तासन्तास लॅबमधी प्रयोग करत असतो तशी एकेक गोष्ट परतपरत पडताळली, तपासली. चिकित्सा केली. निकष काढले. त्यानंतर हाती लागलेलं ते ‘सत्य’ अभंगाच्या ‘फाॅर्म’मध्ये घालून मनोरंजक पद्धतीनं लोकांना सांगितलं. म्हनून त्यो अधिकारवानीनं म्हन्तो, “अनुभवे आले अंगा । ते या जगा देतसे ।।”
…सर्वसामान्य कष्टकर्‍यांबद्दल, शोषितपीडितांबद्दल तुकोबाराया हळवा होता.. अंतरात ओल होती. म्हनून ‘कस’ नांवाच्या दगडाला लावून सोनं पारखलं जातं, तसं आपलं ‘जगनं’ त्यानं अनुभवाच्या कसाला लावलं.. मग फूल्ल काॅन्फीडन्सनं छाती ठोकून सांगीतलं, ‘मी सांगतोय त्यासारखं ‘सत्य’ तुम्हाला जगात सापडनार नाय !’ …चारशे वर्षांपूर्वी त्यानं सोत्ताचा जीव पनाला लावून आपल्याला तळमळीनं ‘आयतं ग्यान’ दिलंय.. फुकट.. आपल्याला ‘अनुभव’ घ्यायची गरज नाय.. फक्त त्यानं ल्हीलेलं समजून घ्यायचंय आनि स्वच्छ नजरेनं जगाकडं बघायचंय. यवढं सोपं हाय.. तरीबी आपल्याला ते ग्यान घेता यिना राव… अजून आपन त्याच दलदलीत खितपत पडलोय.. आता तरी सुधरूया रेS भावांनो…ठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल” यासोबतच त्यांनी #तुका_आशेचा_किरण हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

किरण माने यांच्या या पोस्टवर अनेक सोशल मीडिया युजरने त्यांच्या या पोस्टसोबत सहमत असल्याच्या कमेंट्स देखील केल्या आहेत.

हेही वाचा :

‘माझे स्वप्न अपूर्ण राहिले’, लता दीदींबद्दल बोलताना ‘हा’ चित्रपट निर्माता भावूक

जेवढ्या चांगल्या सवयी तितका यशस्वी माणूस! असा होता लता मंगेशकर यांचा दिनक्रम

…म्हणून कॅटरिना कैफने थेट दाबला सलमान खानचा गळा, पाहा संपूर्ण व्हिडिओ

हे देखील वाचा