Friday, March 29, 2024

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे कौतुक करताना कंगनाने पुन्हा साधला आलिया भट्टवर निशाणा

सध्या देशभरात ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे जोरदार कौतुक केले जात आहे. या चित्रपटाची कथा प्रत्येकाला आवडत असून अनेकांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. यामध्ये आता नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) समावेश झाला आहे. या मिळालेल्या उदंड प्रतिसादादरम्यान आता अभिनेत्री कंगना रणौत चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. आपल्या हटके स्टाईलने आणि सततच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली कंगना राणौतने विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचे कौतुक करताना कोरोना महामारीनंतरचा पहिला यशस्वी चित्रपट असे चित्रपटाचे वर्णन केले आहे. इतकेच नव्हे तर गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी‘ या चित्रपटावरही तिने तोंडसुख घेतले आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री कंगना रणौत सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने आलिया भट्टच्या चित्रपटावर चुकीचे आकडे दाखवल्याचा आरोप केला होता. यासोबतच हा चित्रपट फेक हिट असल्याचे म्हटले होते. आता अलीकडेच कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटो आणि पोस्ट शेअर केले आहेत. शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे शेअर केले आहेत. यासोबतच या फोटोच्या कॅप्शनमध्ये, ‘याला म्हणतात खरे ब्लॉकबस्टर’ म्हणत चित्रपटाचे कौतुक केले आहे. ही पोस्ट कंगनाने चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि चित्रपटात दिसणारे अभिनेते अनुपम खेर यांनाही टॅग केली आहे.

यासोबतच ही पोस्ट शेअर करत कंगनाने “द काश्मीर फाइल्स हा कोरोना महामारीनंतर प्रदर्शित झालेला सिनेमागृहांमधील पहिला यशस्वी आणि फायदेशीर हिंदी चित्रपट आहे. मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे कारण चित्रपट माफिया, त्यांचे गुंड आणि त्यांची विक्री करणारी माध्यमे तुम्हाला सत्य सांगणार नाहीत. इंडस्ट्रीतील कोणीही त्याचे कौतुक करणार नाही, म्हणून मी माझे काम करत आहे.” असे म्हणत या चित्रपटाचे कौतुक केले आहे. यासोबतच कंगनाने नुकतेच चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना अमेरिकेच्या र्‍होड आयलंडने दिलेल्या सन्मानाबद्दल लिहिताना “आशा आहे की आता भारत सरकार लवकरच निर्वासित छावणीत असलेल्या लोकांना काश्मीरमध्ये परत आणण्याची मी वाट पाहत आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तत्पूर्वी या चित्रपटाबद्दल कंगनाने आपले मत देण्याची ही पहिलीच वेळ नाही. या चित्रपटाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर अभिनेत्रीने यापूर्वीही चित्रपटाचे कौतुक केले होते. अलीकडेच, तिच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट शेअर करताना ‘या चित्रपटाने अनेक गैरसमज तोडले आहेत की फक्त बिग बजेट चित्रपट चांगले यशस्वी ठरतात. या चित्रपटाने प्रेक्षकांना पुन्हा थिएटरमध्ये आणले आहे. थिएटरमध्ये एकही जागा रिकामी नाही, त्यामुळे बॉलीवूडच्या मंडळींना धक्का बसला आहे. सारे जग पाहत आहे, पण हे लोक एक शब्दही बोलत नाहीत. आता त्यांची वेळ संपली आहे.” असे म्हणत चित्रपट जगतातील दिग्गज कलाकारांवर टीका केली होती.

दरम्यान सध्या सगळीकडे चर्चेत असलेला द काश्मिर फाईल्स चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या अन्याय अत्याचारावर आधारित आहे. या चित्रपटाला सध्या देशभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात अनुपम खेर, पल्लवी जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

            दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा