Tuesday, July 9, 2024

महाभारतातील ‘भीम’ आर्थिक विवंचनेत, सरकारकडे मदतीची याचना

तब्बल ३० वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारित होणारी ‘महाभारत’ (Mahabharat) ही मालिका खूप गाजली होती. ही मालिका पाहण्यासाठी घरोघर, चौक, गल्ल्या, नाल्यांवर गर्दी व्हायची. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्येही या शोला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. मात्र, आज महाभारत चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यातील पात्रे. ‘महाभारत’ आठवले की पहिले नाव डोळ्यासमोर येते, ते म्हणजे ‘गदाधारी भीम’ची भूमिका साकारणाऱ्या प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti) यांचे. प्रवीण यांनी आपल्या सशक्त व्यक्तिरेखेने केवळ अभिनयातच नाही, तर क्रीडा क्षेत्रातही यश मिळवले. पण आता या अभिनेत्याची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. अडचणीत जगणाऱ्या प्रवीण यांनी जगण्यासाठी सरकारकडे पेन्शनचे आवाहन केले आहे.

सरकारकडे केली ‘ही’ तक्रार
अभिनेत्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “पंजाबमध्ये सरकार बनवणाऱ्या सर्व पक्षांबाबत माझी तक्रार आहे. आशियाई खेळ खेळणाऱ्या किंवा पदक जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंना पेन्शन दिली जाते. मात्र, मला हा अधिकार नाकारण्यात आला.” महत्वाचे म्हणजे, प्रवीण हे सर्वाधिक सुवर्णपदक जिंकणारे खेळाडू आहेत. तसेच राष्ट्रकुलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव खेळाडू आहेत. (mahabharat bheem praveen kumar sobti asked punjab government for pension as his financial condition is not good)

‘असे’ सुरू झाले अभिनयाचे करिअर
एका मुलाखतीत प्रवीण यांनी सांगितले की, “माझी खेळातील कामगिरी आणि माझी शरीरयष्टी पाहून मला बीएसएफमध्ये डेप्युटी कमांडंट म्हणून नोकरी मिळाली. आशियाई खेळ आणि ऑलिम्पिकमध्ये माझे इतके नाव झाले होते की, १९८६ मध्ये एके दिवशी संदेश आला की, बीआर चोप्रा ‘महाभारत’ बनवत आहेत आणि त्यांना भीमच्या भूमिकेसाठी मला भेटायचे आहे. यापूर्वी मी कधीही अभिनयात नशीब आजमावले नव्हते. मात्र या व्यक्तिरेखेबद्दल समजल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. मला पाहताच ते म्हणाला, ‘भीम सापडला आहे.’ येथूनच माझ्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली.” ५० हून अधिक चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी ‘चाचा चौधरी’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेत साबूची भूमिका साकारली होती.

आता काय करत आहेत?
प्रवीण कुमार सांगतात की, “वयाच्या ७६ व्या वर्षी मी उदरनिर्वाहासाठी पैशांची तडजोड करत आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी बराच काळ घरीच आहे. मणक्याच्या समस्येमुळे मी कोणतेही काम करू शकत नाही. एक काळ असा होता की सर्वजण भीमाला ओळखत होते आणि एक काळ असा आहे की, आपलेही परके झाले आहेत.” तसेच प्रवीणसोबत त्यांची पत्नी वीणा देखील आहे, जी त्यांची काळजी घेते. त्याचवेळी त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे, जी मुंबईत राहते.

हेही वाचा-

हे देखील वाचा