Friday, April 19, 2024

‘करण अर्जुन’च्या शूटिंगदरम्यान शाहरुख अन् सलमानवर भडकली होती ममता कुलकर्णी, पण का?

ही त्या दिवसांची गोष्ट आहे, जेव्हा सलमान खानचा (Salman Khan) पहिला १०० कोटींचा ‘हम आपके है कौन’ चित्रपट प्रदर्शित होणार होता. तेव्हाच दिग्दर्शक राकेश रोशन यांना एका कथेची कल्पना सुचली. त्या कथेचा चित्रपट म्हणजे ‘करण अर्जुन’ होय. हा असा चित्रपट आहे, ज्याचा उल्लेख आजही होतो. १३ जानेवारी १९९५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात राखी यांनी ज्या पद्धतीने “मेरे करण-अर्जुन आएंगे… मेरे बेटे आएंगे” बोलला होता, तो प्रेक्षकांना खूप आवडला होता.

हा डायलॉग आपण सर्वजण अनेक प्रसंगी सांगत राहतो. राकेश रोशन दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान, शाहरुख खान (Shahrukh Khan)  काजोल (Kajol), ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni), जॉनी लिव्हर (Johny Lever) आणि अमरीश पुरी (Amrish Puri) हे दिग्गज कलाकार होते. या चित्रपटाला २७ वर्षे उलटल्यानंतर चित्रपटाशी संबंधित काही रंजक किस्से जाणून घेऊया.

काजोल नाही तर जुही चावला होती पहिली पसंती
जेव्हा २७ वर्षांपूर्वी सलमान खान आणि शाहरुख खान अभिनित ‘करण अर्जुन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो जबरदस्त हिट ठरला होता. या चित्रपटात काजोलच्या भूमिकेसाठी राकेश रोशन यांना प्रथम जुही चावलाला (Juhi Chawla) कास्ट करायचे होते. पण काही कारणास्तव जुहीला ते करता आले नाही, म्हणून काजोलला कास्ट करण्यात आले. त्याचवेळी या चित्रपटातील अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या जागी त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री नगमाची (Nagma) वर्णी लागणार होती. चित्रपटाची कथा आणि स्टारकास्टमुळे हा चित्रपट १९९५ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. एकदा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ममता सलमान आणि शाहरुखवर चिडली होती.

ममता कुलकर्णीने शाहरुख-सलमानला शिट्टी वाजवून मारली हाक
‘करण अर्जुन’ चित्रपटातील एक गाणे आहे, ‘आजा-आजा भांगडा पा ले’, या गाण्यात सर्वांच्या स्टेप्स बरोबर येत नसल्याने ते पुन्हा पुन्हा घेतले जात होते. या गाण्याच्या शूटिंगचा काही भाग आटोपल्यावर सर्वजण आराम करत होते. मग ममताने शिट्टी वाजवली आणि शाहरुख खान आणि सलमान खानला तिच्याकडे बोलावले. आपल्याला असे बोलावले जात आहे याची त्यांना आधी कल्पना नव्हती, पण त्यांच्याशिवाय तिथे कोणीही नव्हते. ममताजवळ पोहोचताच ममताने शाहरुखला त्रास देण्यास सुरुवात केली.

ममताने खडसावले सलमान-शाहरुखला
शाहरुख आणि सलमान ममताकडे पोहोचताच ममता म्हणाली की, “या गाण्यात माझे स्टेप्स परफेक्ट जात आहेत, पण तुमच्या दोघांमुळे गाणे खराब होत आहे. उद्या पूर्ण तयारी करून या.” ममताच्या या टोमण्याचा सलमान आणि शाहरुखवर इतका परिणाम झाला की, ते पहाटे ५ वाजता उठून सराव करायचे आणि मग सेटवर यायचे. पण खरी मजा तेव्हा आली जेव्हा फायनलचे शूटिंग सुरू होते.

ममता कुलकर्णीच्या बिघडल्या स्टेप्स
‘आजा-आजा भांगडा पा ले’ या गाण्याच्या शेवटच्या भागाचे शूटिंग सुरू असताना, या गाण्याची कोरिओग्राफर चिन्नी प्रकाश हिने ममताला सांगितले की, “ही दोन मुलं योग्य स्टेप्स करत आहेत, तुझी स्टेप बिघडली आहे.” यावर सलमान आणि शाहरुख एकमेकांकडे अभिमानाने पाहू लागले. हा संपूर्ण प्रसंग शाहरुख आणि सलमानने ‘बिग बॉस’च्या मंचावर शेअर केला होता.

हेही वाचा :

हे देखील वाचा